“उन्हात घाम खूप येतो पण शरीराला थंड वाटत नाही. आता उन्हाची सवय झालीय पण कधी कधी खूप थकवा येतो, हे खूप कष्टाचं काम आहे.”
पालघर जिल्ह्यातील वडराई बंदराच्या किनाऱ्यावर भेटलेले रमेश मेहेर आम्हाला सांगत होते.
वडराईच्या बंदरावर दुपारचे दीड वाजले होते, डोक्यावर सूर्य तळपत होता, पहाटे मासेमारीला गेलेल्या बोटी एकेक करून बंदरात परतत होत्या.
कडक उन्हामुळे घामाने भिजलेल्या पण डोक्यावर कपडा बांधलेल्या बायका आपापल्या ठरलेल्या बोटींची वाट बघत उभ्या होत्या.
प्रत्येक बोटीतील मजूर हळूहळू मासे काढून, किनाऱ्यावरच्या पाण्यात धुवून घेत होते. आधी मोठ्या बोटी, मग लहान तराफे आणि शेवटी बंदरावर आणून मासे तिथे उभ्या असलेल्या महिलांच्या सुपूर्द केले जात होते.
उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी डोक्याला कपडा बांधलेल्या शेकडो महिला बंदरावर उभ्या होत्या.
कुणी ओरडून मासळी विकत होतं, कुणी खरेदी करत होतं तर कुणी झालेल्या व्यवहाराचा हिशेब ठेवत होतं. वडराईच्या बंदरावर भर उन्हात हा मोठ्ठा बाजार भरला होता.
पण…हे सगळं भर दुपारी, तब्बल 34 डिग्री सेल्सिअस तापमानात आणि 64 टक्के आर्द्रतेच्या दमट आणि उष्ण वातावरणात घडत होतं.



