पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण संघर्षामुळे देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचदरम्यान रशियाने तेलाच्या पुरवठ्यात भारताच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
14 आणि 15 मे रोजी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्याआधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 10 मे रोजी इराण संघर्षाचा उल्लेख करून पेट्रोल-डिझेलसोबतच खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आणि सोने कमी खरेदी करण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान म्हणाले होते, “भारताची मोठी गरज कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. पण ज्या भागातून जगाला मोठ्या प्रमाणात तेल मिळतं, तोच भाग सध्या संघर्षात अडकला आहे. त्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत आपणा सर्वांना छोटे-छोटे संकल्प करावे लागतील.”
भारत आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे 90 टक्के तेल आयात करतो. युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली होती. त्यामुळे भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा वाढत गेला.
जुलै 2024 पर्यंत भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये रशियाचा वाटा वाढून 44.6 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. परंतु, अमेरिकेचा दबाव आणि टॅरिफ धोरणांमुळे जानेवारी 2026 पर्यंत हा वाटा कमी होऊन 20.6 टक्क्यांपर्यंत घसरला होता.
रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय म्हटलं?
भारतामध्ये आयोजित ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यापूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरटी इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत-रशिया संबंधांवर मोकळेपणाने भाष्य केले.
लावरोव्ह म्हणाले, “जे लोक भारत-रशिया मैत्रीच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी काळजी करू नये. काही जागतिक शक्ती भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.”



