नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
मान्सूननं निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे.
दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस आधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.
यंदा केरळमध्येही तो वेळेच्या थोडा आधी म्हणजे 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढच्या 3-4 दिवसांत केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
तसंच महाराष्ट्रात दक्षिणेकडेचे जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशातील काही भागांत 17 मेपासून सोसाट्याचा वारा, वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी मध्य भारतात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतही काही ठिकाणी उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहील.
दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सियसपर्यंत वर जाऊ शकतं.



