अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायाच्या संदर्भाने सतत वाद होताना दिसत आहेत. आता वारकरी संप्रदायातील घुसखोरी चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे मूळ वारकरी कोण? आणि वारकरी संप्रदाय नेमका काय आहे ? याविषयी लोक समजून घेत आहेत.
मुळात वारकरी संप्रदायातील संतपरंपरेची सुरुवात झाली ती तेराव्या शतकापासून. तेराव्या शतकाच्या अगोदरही विठ्ठल हे दैवत, पंढरपूर हे क्षेत्र आणि वारीची परंपरा होती.
या वारकरी परंपरेला तात्त्विक अधिष्ठान देण्याचं काम तेराव्या शतकात संतांनी केलं. त्यापूर्वी महाराष्ट्रातील समाजजीवनाची स्थिती अत्यंत विदारक होती.
हेमाद्री हा वैदिक पंडित चातुर्वर्ण्याचा आणि यज्ञयागादी वैदिक कर्मकांडाचा पुरस्कर्ता होता. त्याने ‘चतुर्वग चिंतामणी’ नावाचा ग्रंथ लिहून त्यातून हजारो कर्मकांडाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे.
या हेमाद्रीचा तत्कालीन राजसत्तेवर मोठा प्रभाव होता. साहजिकच त्या काळात जातिविषमता, स्त्रियांना दुय्यमत्व, कर्मकांडाला उत्तेजन आणि गुरुबाजी वाढत चाललेली होती. या वैदिक वर्णाश्रम धर्माला विरोध करणारे काही पंथ महाराष्ट्रात होते.
त्यात विशेषत्वाने महानुभाव आणि लिंगायत यांचा उल्लेख करावा लागेल. बाराव्या शतकातील हे दोन पंथ वेदप्रामाण्य, चातुर्वर्ण्य आणि कर्मकांडाच्या विरोधात उभे होते. ते सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे होते.
वैदिक धर्मात ज्यांना नीच आणि हीन मानलं गेलं अशा स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना सन्मान देण्याची या पंथांची भूमिका होती. या दोन्ही पंथांना वैदिकांच्या प्रखर रोषाचा सामना करावा लागला.
महानुभाव पंथातील एका चर्मकाराला चुन्याच्या कळीत बसवून पखालीने पाणी ओतून भाजून मारण्याची शिक्षा दिली गेल्याची घटना ‘लीळाचरित्रा’त आली आहे.



