होर्मुझ सामुद्रधुनीत गुजरातमधील एका जहाजावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
जहाजाच्या मालकाच्या माहितीनुसार, माल चढवून हे जहाज पर्शियन आखातातील दुबई बंदरातून येमेनमधील अल मुकल्ला बंदराकडे निघाले होते. मात्र युद्धानंतर जहाजांच्या हालचालीसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पोहोचताच त्यावर हल्ला झाला आणि ते ‘काही क्षणांतच बुडाले’.
जहाज उलटताच त्यावरील 18 खलाशी समुद्रात उडी मारून बाहेर पडले. मालकाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यादरम्यान त्यांपैकी पाच जण आधीच गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक अल्ताफ केर याच्यापर्यंत मदत पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
परिस्थिती लक्षात घेऊन मृत खलाशाच्या कुटुंबाने त्याचे पार्थिव दुबईतच दफन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारीही झाला एका जहाजावर हल्ला
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या आणखी एका जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा प्रकार ‘अस्वीकारार्ह’ असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं या जहाजाचं नाव ‘हाजी अली’ असल्याची माहिती दिली आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी सकाळी भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर झालेला हल्ला अस्वीकारार्ह आहे, असं गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
व्यावसायिक जहाजं आणि नाविकांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचा आम्ही निषेध करतो, असं निवेदनात म्हटलं आहे.



