भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी (15 मे) एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी आज (16 मे) स्पष्टीकरण दिलं आहे.
लाइव्ह लॉ आणि बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, प्रसारमाध्यमांतील एका गटाने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आणि मी देशातील युवकांवर टीका केली असल्यासारखे चित्र उभा केलं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, त्यांचं वक्तव्य सर्वसाधारण युवकांविरोधात नव्हतं. ते फक्त बनावट किंवा खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या व्यवसायात आलेल्या लोकांविरोधात होतं.
ते म्हणाले, “शुक्रवारी (15 मे) एका निरर्थक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांतील एका गटाने चुकीचा अर्थ लावला, हे पाहून मला वाईट वाटलं.”
“माझी टीका अशा लोकांवर होती जे बनावट किंवा खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या क्षेत्रांत आले आहेत. असे लोक प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित क्षेत्रांतही शिरले आहेत. त्यामुळे ते परजीवीसारखे आहेत.”
देशातील तरुणांवर टीका केल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
“मी देशातील तरुणांवर टीका केली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील मानवी क्षमतेवर मला अभिमान आहे. प्रत्येक भारतीय तरुण मला प्रेरणा देतो. भारतीय तरुणांचा माझ्यावर मोठा विश्वास आणि आदर आहे. मीही त्यांच्याकडे विकसित भारताचे मजबूत आधारस्तंभ म्हणून पाहतो,” असंही त्यांनी नमूद केलं.
सरन्यायाधीश सूर्यकांत नेमकं काय म्हणाले होते?
शुक्रवारी (15 मे) वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या एका वकिलाच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत सुनावणी करत होते. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवरील वाढत्या ‘अनुचित हल्ल्यां’बाबत तीव्र शब्दांत भाष्य केलं होतं.



