“रात्रभर झोप येत नाही. बाहेर झोपायला गेलं तर डास चावतात आणि घरात आलं तर गर्मी झोपू देत नाही. असं वाटतं दुसऱ्याच्या घरात निघून जावं. माझं बाळ पण राहत नाही. आम्ही काय करणार?”
उकाड्यामुळं हैराण झालेल्या सीमा पांढरे वैतागून बोलत होत्या.
सीमा अकोल्यात खरप भागात राहतात. त्यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे. त्यांच्या घराच्या भिंतीही पत्र्याच्याच आहेत. एवढ्या प्रचंड तापमानात त्या दोन मुलं, नवरा आणि सासूसोबत या पत्र्याच्या एका खोलीत राहतात.
एप्रिल 2026 मध्ये अकोल्यात सलग 8 दिवस तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर होतं.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 एप्रिलला तर अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यादिवशी हे तापमान देशातील सर्वोच्च तापमान होतं.
त्यामुळं या वाढलेल्या तापमानामध्ये सर्वसामान्यांना जगणं कठिण होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
इतक्या तापमानात इथला कष्टकरी वर्ग, मजूर वर्ग, गरीब वर्ग कसा राहतो? हे पाहण्यासाठी आम्ही 7 मे रोजी अकोल्यात पोहोचलो.



